वणी :
जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान जाणीवपूर्वक होणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड वणी, जिल्हा पांढरकवडा यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी तसेच पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पाठविण्यात आले.
निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या “स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब” या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. गोवंश संरक्षण हे सार्वजनिक हिताचे असून भारतीय संविधानातील कलम ४८ आणि ५१ (अ) (ग) नुसार गोसंवर्धन व प्राण्यांविषयी करुणा बाळगणे हे राज्य आणि नागरिकांचे कर्तव्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतीय कृषी व्यवस्था, पर्यावरण आणि संस्कृतीचा गोवंश हा कणा असून त्यांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. रासायनिक शेतीमुळे जमीन व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता गोसंवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
तसेच, गोवंश हत्या ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजात धार्मिक भावना दुखावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे संवेदनशील सुरक्षा विषय म्हणून पाहून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात भगवान श्रीकृष्ण, Chhatrapati Shivaji Maharaj, Sant Gadge Baba तसेच Mahatma Gandhi यांच्या विचारांचा उल्लेख करत गोसंरक्षण ही भारतीय संस्कृतीची परंपरा असल्याचे सांगण्यात आले.
शेवटी, प्रचलित कायद्यांनुसार गोवंश हत्या पूर्णपणे बंद करून गोरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाला करण्यात आले आहे.