वणी /
यावर्षी खरीप हंगामापासूनच 'जगाचा पोशिंदा' म्हणून ओळखला जाणारा शेतकरी संकटात सापडला आहे. मे,जुन जुलै, ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर या कालावधीत सततच्या झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पन्न मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी होणार आहे.
वणी तालुक्यातील मोहुर्ली येथील शेतकरी सुर्यभान दादाजी डाहुले यांनी हताश होऊन आपल्या उभ्या सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरवला आहे. याबाबत स्टिंग ऑपरेशन न्यूज च्या प्रतिनिधी ने शेतात जाऊन माहिती घेतली.
यावर्षी उत्पन्नाची हमी राहिली नसल्यामुळे शेतकरी सुर्यभान दादाजी डाहुले, यांनी हे कठोर पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याचा आक्रोश..!
दरवर्षी मला १०० पोते सोयाबीन पीकायचे मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक उध्वस्त झाले आहे. सोयाबीन ला शेंगा तर लागल्या मात्र दाने भरले नाही. यावर्षी निसर्गाचा कोप झाला आहे. बळीराजा किती संकटांना तोंड देणार? तो मेटाकुटीला आला आहे.
पुढे कसे जगावे, याची मोठी विवंचना शेतकऱ्यांसमोर उभी आहे. याच चिंतेतून शेतकरी सुर्यभान दादाजी डाहुले, यांनी मोहुर्ली शिवारात असलेल्या ठेका- मक्ताच्या बारा एकर शेतात लावलेल्या सोयाबीन पिकात रोटावेटर घातला. काढणीचा काळ जवळ आला, तरी उत्पादन खर्चही निघणार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी ' करिश्मा, उन्नती, मालवीका या तिन कंपनी चे बियाणे वापरले होते, मात्र आता कंपनी साधी विचारपूस करायलाही तयार नाही. सुमारे दोन ते अडीच लाखाचा खर्च झाला आहेत. आधीच नगदी पीक असलेले सोयाबीन हातातून गेले. काढणीसाठी कोणी बटाईनेसुद्धा (कंत्राटी) घ्यायला तयार होत नाही अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी होणार आहे.