वणी :
राज्य शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीकपाहणी सक्तीची केली आहे. मात्र यातील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी चांगलेच बेजार झाले आहेत. ई-पीकपाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना सर्व्हर डाउन, नेटवर्क, ॲप न उघडणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे परिणामी सात बारा वर पीक पेरा नोंदणी न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वणी तालुक्यातील शिरगीरी आणि उमरी येथिल शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मागील वर्षी सन २०२४ च्या रब्बी हंगामापासुन आणि यावर्षी सुध्दा सन २०२५-२६ शेतीच्या हंगामात पिकपेरा नोंदणी करण्याकरिता ई पीक अॅप, मोबाईल मध्ये अडचणी येत आहे. मागील वर्षी रब्बी हंगामामध्ये पीक पेरा नोंदणी सात बारा वर न झाल्याने नाफेड आणि सिसिआय खरेदी केंद्रावर शेतमाल टाकता आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच खरीप हंगामामध्ये पीक विमा काढला परंतु सात बारा वर त्याची नोंद झाली नाही त्यामुळे आमचा सात बारा कोरा राहिल आणि आम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे पीक पेरा नोंदणी करण्यासाठी तलाठी किंवा तलाठी सहायक यांना पाठवून ई पीक पाहणी करून पीकाची नोंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी चंद्रकांत सातपुते, दिलीप ढेंगळे, बंडू पिंपळकर यांच्यासह उमरी, शिरगीरी येथिल शेतकरी शेतकरी उपस्थित होते.