वणी | प्रतिनिधी :
वणी शहरातील जैताई मंदिर परिसरातील रहिवासी तथा महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रवीणभाई जयरामभाई ठक्कर (वय ८३) यांचे रविवारी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
समाजाभिमुख विचारसरणी जपत त्यांनी आपल्या हयातीतच देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेज) देहदान करण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाचे योगदान मिळणार आहे.
ठक्कर कुटुंबावर यापूर्वीही मोठा आघात झाला होता. अवघ्या दीड वर्षांपूर्वी त्यांचे ज्येष्ठ पुत्र दीपेश ठक्कर यांचे अकाली निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच प्रवीणभाई यांच्या निधनाने ठक्कर परिवारावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी वासंतीबाई ठक्कर, धाकटे चिरंजीव मनीष ठक्कर, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.