एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात वणीत विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा

वणी :

एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात तसेच वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ वणी येथे गुरुवार, २ जुलै रोजी हजारो स्पर्धा परीक्षार्थी युवक-युवतींनी भव्य एल्गार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
या मोर्चात विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्वीप्रमाणे पारदर्शक ऑफलाइन परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली. ऑनलाइन परीक्षा पद्धतीत अनेक प्रकारचे घोटाळे होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्नपत्रिका दिल्याने समान संधीच्या तत्त्वाला धक्का बसत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
याशिवाय, पेपरफुटीच्या घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे, तसेच शासनाने दरवर्षी परीक्षांचे निश्चित वेळापत्रक आणि रिक्त पदांचा तपशील आगाऊ जाहीर करावा, अशा विविध मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव तसेच जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या एल्गार मोर्चामध्ये वणीसह परिसरातील हजारो स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात मोर्चाची व्यापक चर्चा रंगली असून, शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post