सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे भव्य सिन्दुर तिरंगा यात्रा , * भर पावसात हजारो देशभक्त नागरिक सहभागी

वणी:–

      पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहेलगाम येथे 26 निष्पाप लोकांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अभियान राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या अभियानात सहभागी सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे आज दिनांक 22 मे ला भर पावसात हजारो देशभक्त महिला व पुरुष या तिरंगा यात्रेत सहभागी होऊन संपूर्ण देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा संदेश दिला. 
        माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकाराने वणीतील देशभक्त नागरिकांची तिरंगा यात्रेची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून ही तिरंगा यात्रा निघताच वरून देवतेने प्रसन्न होऊन वृष्टी केली. अशाही स्थितीत कुठेही विचलित न होता देशभक्त नागरिक रॅलीत शेवटपर्यंत सहभागी झाले होते. भारत मातेच्या भूमिकेत कौमुदी धनंजय सरमोकदम ही होती. 
     देश रक्षणासाठी भुदल, नौदल व वायुदल अधिकारी यांनी सिंदूर मोहीम अंतर्गत भारतीय क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करून प्रथम पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर शत्रूचे सैनिक ठिकाणे व एअरबेसेस मातीत मिसळविले. सिंदूर मोहीमच्या या अभुतपुर्व यशाने सारे जग अचंबित झाले. हे सर्व घडले ते संरक्षण दलातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकारी व सैनिक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण समन्वयाने. त्यांनीच आपल्या भारत मातेचे रक्षण केले आहे. या सैनिकांचे मनोधैर्य, आत्मबळ व शौर्याप्रती क्रुतज्ञतापूर्वक आभार मानण्यासाठी टिळक चौकात या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. 
       समारोप प्रसंगी सध्या भारतीय सेनेत कार्यरत सैनिकांच्या पालकांचा साडी चोळी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघातील उपस्थित सर्व माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कॅप्टन महादेव गाताडे, किरण बुजोने, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ऑपरेशन सिन्दुर मधील वीर सैनिकांच्या शौर्याचा व पराक्रमाची माहिती उपस्थितांना देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून भारतीय लष्कराच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा असल्याचा उद् घोष केला. 
         या तिरंगा यात्रेत वणी विधानसभा मतदार संघातील सर्व सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, सहजयोग समिती, माजी सैनिक समिती अशा विविध संघटना यात सहभागी झाल्या . या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. पहलगाम येथे बळी पडलेल्या व देशाच्या सीमेवरील हुतात्म्यांना श्रद्धांजली देवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले.

श्री महावीर बहुद्देशीय संस्थेतर्फे तिरंगा यात्रेकरूंना जल सेवा

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे गुरुवारी भव्य सिन्दुर तिरंगा रँली काढण्यात आली होती. दरम्यान शहरातील मुख्य मार्गावरुन दुपारी भव्य तिरंगा यात्रा निघताच ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनेतर्फे पाणी वितरण करण्यात आले होते. 



Post a Comment

Previous Post Next Post