समाजातील आस्था तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहा - शैलेशजी जोशी

वणी:- 
          हिंदू समाज संघटित होऊन त्याचे प्रगटीकरण झाले की, सकारात्मक मोठे बदल होतात. असे होऊ नये यासाठी समाजातील आस्था तोडण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यापासून सजग राहून हे षंढयंत्र हाणून पाडण्याचे काम सज्जन शक्तीला करायचे आहे. सज्जनशक्ती निर्माणाचे कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेतून चालते त्यासाठी दैनंदिन शाखा महत्वाची आहे. असे प्रतिपादन विद्याभारती चे विदर्भ व देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री शैलेशजी जोशी यांनी केले. ते वणी येथे साजरा करण्यात आलेल्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. 

       येथील एस.पी. एम. हायस्कुल च्या प्रांगणात दि. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निलेशा अंकुश बलकी या होत्या. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत, नगर संघचालक किरण बुजोणे उपस्थित होते. 
     कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते शस्त्र पूजनाने झाली. त्यानंतर घोष पथकाचे प्रात्यक्षिक, योगासन, व्यायाम योग, दंड क्रमिकांचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. 
       आपला विषय मांडताना शैलेशजी पुढे म्हणाले की, नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा कालखंड आहे. या कालखंडात शक्ती प्राप्त करून आसुरी शक्तीवर विजय मिळवायचा आहे. ज्या राष्ट्रांकडे व समाजाकडे शक्ती असते त्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होत नाही. विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारी भारताची हिंदू संस्कृती आहे. भारतीय चिंतन हे श्रेष्ठ चिंतन आहे. आम्ही सर्व एक आहोत, ईश्वरी अंश सगळ्यात आहे. असा एकात्मतेचा संदेश देणारे आपले चिंतन आहे. त्यामुळे जागतिक संघर्षाच्या काळात भारताकडे जग आज आशाळभूत नजरेने पहात आहे. आपल्या देशात पावणे सात लाख गावे आहेत. यांच्यात एकत्वाचे नाते निर्माण झाले की, आपले राष्ट्र सामर्थ्यशाली होणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबात समरसतेचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. तेव्हा समरस हिंदू समाज निर्माण होईल. 

      प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना डॉ. बलकी म्हणाल्या की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संघ मागील 100 वर्षांपासून कार्यरत आहे. समाजाचा सर्वांगीण विकास हेच संघाचे ध्येय आहे. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर संघचालक किरण बुजोणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यशिक्षक कवडू पिंपळकर यांनी केले. सुभाषित आकाश मोहितकर, अमृतवचन कल्याण पांडे, सांघिक गीत प्रेमकुमार धगडी, वैयक्तिक गीत प्रवीण सातपुते यांनी सादर केले.

Post a Comment

Previous Post Next Post