"आठवीची पूजा" निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थँक्यू’ म्हणण्याचा विधी

वणी :
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार. निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थॅंक्यू’ म्हणण्याचाच जणू हा विधी आहे. अष्टमीला केली जाणारी पूजा म्हणजे आठवी, आज ही पूजा अनेक ठिकाणी साजरी झाली. त्यासाठी बाजारातही संबंधित पूजासाहित्याची खरेदी दिवसभर चालली.दसरा आणि दिवाळीच्या मध्ये ही पूजा होते. त्यामागे अनेक लोककथा, दंतकथा आहेत. भारतात शेती संपन्न आहे. या शेतीसंस्कृतीतून अनेक सण आलेत. आठवीची पूजा ही देवीची पूजा मानली जाते. काहीजण ही लक्ष्मीही मानतात. अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही पूजा होते.एरवी शेतातून पिकं घरात आलेली असतात. या पिकांचीही पूजा या निमित्तानं करतात. पूर्वी ज्वारी हे मुख्य पीक होतं. त्याचेच पदार्थ खाण्यात असायचे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या या पूजेत ज्वारीचंही महत्त्व आलं. ज्वारीच्या कण्यांची आंबील यावेळी केली जाते. लोककथांनुसार कुंती आणि गांधारीने ही पूजा केली असं सांगतात.आपली माता कुंती ही पूजा करीत आहे, हे अर्जुन पाहतो. आपल्या आईसाठी तो देवी अथवा इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र आणि ऐरावत पृथ्वीवर येतात. त्या ऐरावत हत्तीवर बसून कुंती प्रसाद वाटते. या दिवशी अनेकजण आपापल्या देवतांची पूजा करतात.कालानुसार विविध देवता वाढलेत. काही कमी झालेत. एकंदरीतच हा कृषीसंस्कृतीतला महत्वाचा सोहळा आहे. विशेषतः हा विदर्भातच होतो. दिवाळीच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होतात. आपल्या ईश्वराला, निसर्गाला थँक्यू म्हणण्याचाच हा सोहळा आहे.     

सुनील इंदु वामन ठाकरे वणी, जि. यवतमाळ

Post a Comment

Previous Post Next Post